दलवीर भंडारी यांच्या विजयामागे सुषमा स्वराजांची कूटनीती
लॉबिंगसाठी केले 60 फोन कॉल्स
नवी दिल्ली - संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयातील न्यायाधीशपदासाठी झालेल्या निवडणुकीत भारताचे उमेदवार न्यायाधीश दलवीर भंडारी यांची आणखी नऊ वर्षांसाठी फेरनिवड झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या राजनैतिक मुत्सद्दीगिरीचा हा मोठा विजय मानला जात आहे. भारताचा हा विजय सहजासहजी झाला नसून केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून राबवण्यात आलेली आक्रमक कूटनीती यासाठी कारणीभूत ठरली. भारताला मोठ्या प्रमाणात मिळणार समर्थन मिळताना पाहून ब्रिटनचे उमेदवार न्यायाधीश ख्रिस्तोफर ग्रीनवूड यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने भारताला आपल्या विजयाची खात्री पटली.
भारतीय न्यायाधीश दलवीर भंडारी यांची पुन्हा एकदी निवड व्हावी यासाठी केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज स्वत: सक्रिय होत्या. दलवीर भंडारींना पुर्ण समर्थन मिळावं यासाठी सुषमा स्वराजांनी परराष्ट्र मंत्र्यांना 60 हून जास्त फोन कॉल्स केले. परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनीदेखील सोमवारी होणा-या पुढील राऊंडच्या निमित्ताने देशभरातील नेत्यांशी चर्चा करत भारताची बाजू त्यांच्यासमोर मांडली. मंगळवारी दलवीर भंडारी यांची निवड झाल्यानंतर एस जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिन आणि वरिष्ठ नेत्यांना फोन करुन भारताच्या बाजूने मतदान करण्यासाठी इतर देशांना तयार केल्याबद्दल आभार मानले. परराष्ट्र राज्यमंत्री एम जे अकबर यांनीदेखील दलवीर भंडारी यांना समर्थन मिळावं यासाठी पुरेपूर प्रयत्न केले.



COMMENTS